Friday, August 1, 2025
घरदेश आणि विदेश“अलविदा सरदार !” अभिनेता किरण मानेंची डॉ. मनमोहन सिंह साठी भावनिक पोस्ट...

“अलविदा सरदार !” अभिनेता किरण मानेंची डॉ. मनमोहन सिंह साठी भावनिक पोस्ट चर्चेत

प्रतिनिधी : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे काल (२६ डिसेंबर २०२४) निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघा देश दु:ख व्यक्त करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटींनीही आपल्या श्रद्धांजली पर भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अभिनेता किरण माने यांनीही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेते किरण माने यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या आठवणी सांगणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांची भारतीय राजकारणातील एंट्री ते त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं केलेलं पुनरुज्जीवन यावर भाष्य केलं. शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलंय की,

“खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?” नव्यानं निवडून गेलेले त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी अर्थमंत्रालयातून आलेली आठ पानांची नोट वाचून कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रांना विचारलं..
चंद्रांनी उत्तर दिलं “नाही… याहूनही खूप वाईट आहे”
भारतीय अर्थव्यवस्थेनं पार जीवच सोडला होता ! नरसिंहरावांनी ओळखलं की आर्थिक पेच सोडवण्यासाठी अर्थमंत्रीपदावर कुणी ऐरागैरा थातूरमातूर खासदार बसवून चालणार नाही. त्यांनी तातडीनं ‘अर्थव्यवस्था’ या विषयातील अशा अभ्यासू-तज्ञ-बुद्धिमान व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली, जो राजकारण बाहेरचा असेल… त्यांना समजलं,भारतात एक असा अर्थतज्ञ प्राध्यापक आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे.. या भयाण परीस्थितीत देशाला तारू शकेल असा तो एकच अत्यंत अभ्यासू-प्रतिभावान-खतरनाक माणूस आहे, वन ॲन्ड ओन्ली डॉ. मनमोहन सिंग !
पण गडी राजकारण बाहेरचा. शिक्षक. तयार होईल का? ते काम पी.सी. अलेक्झांडर यांनी केलं. सिंग तयार झाले. हा ‘होकार’ पुढे देशाच्या उत्कर्षात खूप महत्त्वाचा ठरणार आहे असा थोडासाही अंदाज कुणाला आला नसंल !
मनमोहन सिंग यांनी पदावर आल्यापासूनच कामाचा धडाकाच लावला.. पहिल्या झटक्यात मनमोहन सिंगांनी निधड्या छातीनं पत्रकार परिषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचं भयाण भेसूर चित्र, न लपवता उघडपणे सर्वांसमोर मांडलं. निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षानं काही अत्यावश्यक वस्तूंची यादी देऊन हे दर शंभर दिवसांत स्थिर करून मागे नेऊ असं आश्वासन दिलं होतं… मात्र सिंग यांनी स्पष्ट सांगितलं, “हे शक्य नाही. आपल्याकडं अशी कुठलीही जादूची छडी नाही.” झालं ! काँग्रेस पक्षात भूकंपच झाला. सगळे म्हणायला लागले “अहो पी.एम्, काय बोलतायत हे? इतकं खरं बोलायचं असतं व्हय जनतेशी…??” पण रावांनी लै दूरचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भल्याचा विचार करून या माणसाची निवड केली होती.
पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात मनमोहन सिंग यांनी व्हिक्टर ह्यूगो याच्या वाक्यानं केली, “ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही.”
त्यानंतर देशात जी हवा आली भावांनो, ती याआधी कधीच आली नव्हती. मरणाच्या दारात असलेली आपली अर्थव्यवस्था फक्त रूळावरच आली नाही, तर तिनं बुलेट ट्रेनच्या दहापट वेग पकडला. आज जगभर इकॉनॉमीचे शिक्षण देणार्‍या युनिव्हर्सिटीजमध्ये मनमोहन सिंगांना ‘भारताच्या आर्थिक क्रांतीचा जनक’ म्हणून ओळखलं जातं.
आज अक्कलशून्य, वाचाळ थापड्यांचा थयथयाट सुरू आहे. अर्थव्यवस्था शेवटच्या घटका मोजतेय. अशावेळी मनमोहन सिंगांचं जाणं खुप चटका लाऊन गेलं. अलविदा सरदार !”

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments