कराड : कराड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
शासकीय कामासाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांशी काही कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप केला जात आहे. आधीच विविध कृषी योजनांची माहिती, कागदपत्रे आणि कामांसाठी शेतकऱ्यांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यात अशा प्रकारची वागणूक मिळत असल्याने शेतकरी वर्गातून प्रश्न उपस्थित होत आहेत.
त्यातच सायंकाळी ५.१५ वाजताच कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आल्याचा आरोप असून, शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम आणि इतर व्यक्तींसाठी वेगळे नियम का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांशी सन्मानाने वागणे आणि त्यांची शासकीय कामे वेळेत करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे चप्पल-बूट बाहेर काढण्याची सूचना, कर्मचाऱ्यांची वागणूक आणि कार्यालय बंद करण्याची वेळ याबाबत तालुका कृषी अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना; पण शासकीय कार्यालयातच शेतकऱ्यांचा अपमान का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.




