कराड(प्रताप भणगे)

: सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांनी काँग्रेस पक्षाचे सहयोगी खासदार विशालदादा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, मुकेश मोहिते, अबरार यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या मनमोकळ्या संवादात खासदार विशालदादा पाटील यांनी सातारा जिल्ह्याला लाभलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचा गौरव केला.
ते म्हणाले, “सातारा जिल्ह्याला पृथ्वीराज बाबांसारखे अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेचे आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशात कुठेही गेला तरी अभिमानाने पृथ्वीराज बाबांचे नाव घेऊ शकतो. त्यांच्या विद्वत्तेला आणि प्रशासकीय अनुभवाला खऱ्या अर्थाने तोड नाही. आम्हालाही त्यांचे मार्गदर्शन लाभत आले आहे.”
पुढे ते म्हणाले, “तुम्ही पृथ्वीराज बाबांच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहात. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा, पक्षाची मूल्ये आणि जनहिताचा दृष्टिकोन कायम जपण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि राज्याच्या विकासासाठी केलेली ऐतिहासिक कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचली पाहिजेत.”
राज्याच्या विकासात पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबविलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख करत, ती विकासकामे आणि त्यामागील दूरदृष्टी नव्या पिढीसमोर मांडणे आवश्यक असल्याचेही खासदार विशालदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद वाढविणे, बूथस्तरावरील संघटना सक्षम करणे आणि आगामी काळात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
त्यानंतर नामदेवराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी विधानपरिषद सदस्य मोहनरावदादा कदम यांचीही सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. नव्या जबाबदारीबद्दल मोहनरावदादा कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन वाढीसाठी प्रभावीपणे काम करावे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




