सातारा(अजित जगताप) : मैत्री म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगतीची पायरी असते योग्य मित्राची निवड केली तर आयुष्याची हिरवळ बनते. याची प्रचिती साताऱ्यात पाहण्यास मिळाली. एकाच वेळी पोलीस भरती झालेले तीन मित्र परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस दलात अधिकारी झाले.
सातारा वाई व शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हच्या शोध लावण्यात खारीचा वाटा उचलणारे पोलीस स्वप्निल पवार , दिपक साठे, सनील निकम हे तीन मित्र बारा वर्षांपूर्वी पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली होते. पदवीधर असूनही त्यांना पोलीस दलाचा अनुभव घेण्याची इच्छा झाली होती. त्या इच्छे खातर त्यांनी पोलीस दलातच काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पोलीस दलातील अनेक आव्हाने त्यांनी सहजरीत्या पेलली. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची गवसणी घालण्यासाठी स्वतःला सिद्ध केले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या पोलीस वर्दी खांद्यावर स्टार लावले.
पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत शारीरिक क्षमता वाढवली. लेखी परीक्षेसाठी अभ्यास केला. अखेर तिन्ही मित्रांना पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये यश मिळाल्यानंतर सोबत त्यांचे मित्रपरिवार नातेवाईक व शेजाऱ्यांना सुद्धा मोठा आनंद झाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या यशामध्ये सर्वजण सहभागी होऊन गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी आणि आपापल्या गावांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. आता हे तीन पोलीस अधिकारी कर्तव्यदक्षतेने पोलीस दलाचे नाव उज्वल करतील. अशा अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील मंत्री खासदार आमदार यांच्यासह नूतन सातारचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस अधिकारी व पोलीस मित्र व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.
————————————————
फोटो- साताऱ्यातील तीन पोलीस मित्र बनले पोलीस अधिकारी (छाया– निनाद जगताप सातारा)




