मुंबई : धारावीमधील सर्व पात्र अपात्र झोपडपट्टीवासियांना धारावीत ५०० चौ.फू.ची घरे देण्यात यावी, कोणत्याही झोपडपट्टीवासियाचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्यात येऊ नये आदी प्रमुख मागण्या अदानी कंपनी, राज्य सरकारकडे वारंवार करुनही या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ४ मे रोजी सकाळी ११ वा. अदानी कंपनीच्या माटुंगा येथील कार्यालयावर धारावी बचाव आंदोलन या संघटनेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा काल करण्यात आली.
धारावीतील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचे कंत्राट हे मे. नवभारत मेगा प्रा.लि.या अदानी समुहाच्या कंपनीस राज्य सरकारने दिलेले आहे. ही कंपनी आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण-एसआरए यांच्या मार्फत धारावीत झोपड्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.परंतु या सर्व्हेक्षणात केवळ ५००० हजार झोपड्याच पात्र झालेल्या आहेत.मोठ्या प्रमाणात झोपड्या अपात्र करुन धारावीकरांना धारावीच्या बाहेर फेकण्याचा डाव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत धारावी बचाव आंदोलन या संघटनेची बैठक नुकतीच दादर शिवसेना भवन येथे झाली.या बैठकीस धारावी बचाव आंदोलन या संघटनेचे एक प्रमुख नेते माजी आमदार बाबुराव माने, शिवसेना विभाग प्रमुख आमदार महेश सावंत, शिवसेनेचे विभाग संघटक विठ्ठल पवार ,विधानसभा समन्वयक महादेव शिंदे, शाखाप्रमुख किरण काळे,आनंद भोसले, मुन्ना शेख, सतिष कटके, मनी कडंन,गणेश तेवर, समन्वयक सुरेश सावंत, गंगा देरबर, राष्ट्रवादी पार्टीचे स्थानिक अध्यक्ष उलेश गजाकोश, माकपचे वसंत खंदारे, आपचे राफेल पाॅल,बसपाचे शामलाल जैस्वार, सपाचे राहूल गायकवाड , भाकपचे नसरुल हक,कुंचीकोरवे समाजाचे ज्येष्ठ नेते जगन भोसले यासह धारावी बचाव आंदोलनचे अनेक पदाधिकारी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार अनिल देसाई यांनी या बैठकीत धारावीत अदानी कंपनी एसआरए कडून सुरु असलेल्या एकतर्फी कारभाराचा- कामाचा आढावा घेतला.४ मे रोजी निघणाऱ्या मोर्चात आपण सहभागी होऊ अशी ग्वाही धारावी बचाव आंदोलनला यावेळी अनिल देसाई यांनी दिली.
कोळी बांधवांची मागणी रास्त
धारावी पुनर्विकास प्रकल्पातून कोळी वाड्याला वगळण्याबाबत कोळी जमात ट्रस्ट ही संस्था अजुनही आक्रमक आहे.कोळी बांधव हे या मुंबईचे आद्य भूमिपुत्र आहेत.त्यांना त्यांची संस्कृती, पारंपारिक व्यवसायाचे जतन करायचे आहे.यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पातून त्यांना बाहेर ठेवावे ही त्यांची मागणी अतिशय रास्त आहे. यासंदर्भात हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. असे बाबुराव माने या बैठकीत बोलताना म्हणाले आहेत.
कोळी बांधवांना न्याय हवा
कोळी बांधवांच्या मागण्यांबाबत अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे.यासाठी तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. कोळी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे असे अनिल देसाई यावेळेस बैठकीत बोलताना म्हणाले.
झोपलेल्या अदानी कंपनीस जागे करणार मोर्चा
माजी आमदार बाबुराव माने म्हणाले अदानी कंपनी आत्तापर्यंत फक्त ५ हजार झोपड्यांना सर्व्हेक्षणात पात्र करु शकलेली आहे.त्यांना जास्त झोपड्या पात्र करायच्या नाहीत. ८० ते ९० हजार झोपड्यांचे पुनर्वसन हे अदानीला मुलुंड, दहिसर गोवंडी मध्ये डंपिंग ग्राउंडवर- कचरा भूमीवर करायचे आहे.तसेच राज्य सरकार एसआरएकडे आम्ही वारंवार मागण्या करुनही सरकार एसआरए काही हलत नाही म्हणून चार मे रोजी झोपलेल्या अदानी कंपनीस जागे करण्यासाठी धारावीच्या संविधान चौकातून हा मोर्चा निघणार असल्याचे बाबुराव माने म्हणाले.
धारावीत सादरीकरण नाही
आमदार महेश सावंत म्हणाले तिकडे गोरेगावला मोतीलाल नगरची पुनर्विकास प्रक्रिया सुरु आहे.तेथे रहिवाशांसमोर म्हाडा- अदानी कंपनी प्रेझेंटेशन- सादरीकरण करीत आहे.असे सादरीकरण धारावीत अदानी कंपनी का करीत नाही असा माझा सवाल असल्याचे महेश सावंत म्हणाले.
अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात धारावी झोपडपट्टीवासियांना अपात्र करीत आहे.यामुळेच रहिवाशांमध्ये मोठी नाराजी, संताप उसळलेला आहे.या पार्श्वभूमीवर हा मोर्चा धडकणार आहे.या मोर्चाची जनजागृती धारावी बचाव आंदोलनने सुरु केलेली आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप),शेकाप, सपा, भाकप, माकप,आम आदमी यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते धारावीतील वस्ती वस्तीत जाऊन या मोर्चाबाबत जनजागृती करीत आहे.या मोहिमेस लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.यामुळेच अदानी कंपनीवर धडकणाऱ्या मोर्चात फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे असे बाबुराव माने यांनी सांगितले.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईत धारावी येथे आहे.सुमारे ६०० एकरवर ही झोपडपट्टी पसरलेली आहे.येथे एकूण सुमारे सव्वा लाख झोपड्या असून या झोपड्यांच्या बदल्यात या झोपडपट्टीवासियांना धारावीत घरे देण्यात यावी अशी धारावीकरांची मागणी आहे.प्रत्येक झोपडपट्टीवासियास ५०० चौ.फू.चे घर दिले तरी या ६०० एकरवर सव्वा लाख लोकांचे पुनर्वसन धारावीतच होऊ शकते असा दावा धारावी बचाव आंदोलन या संघटनेने केलेला आहे.असे असतानाही अदानी कंपनीस धारावी बाहेर मुलुंड, दहिसर, कुर्ला मदर डेअरी, मानखुर्दला जमिन देण्याचे कारण काय असा सवाल धारावी बचाव आंदोलन तर्फे करण्यात येत आहे.



