नवी मुंबई : विकासाची ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्वाची असून हे काम काळजीपूर्वक व बिनचूक करावे असे महापालिका आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले. जनगणना कार्य निर्देशालय महाराष्ट्र यांच्या वतीने जनगणना 2027 विषयक कार्यवाही सुरु होत असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे चार्ज अधिकारी, अतिरिक्त् चार्ज अधिकारी व जनगणनेशी संबधीत अधिकारी,कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यातील घरांची यादी तयार करणे (House Listing Blocks Formation) विषयक प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
नवी मुंबई महानगरपालिकेची नुकतीच झालेली निवडणूक अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने पार पडली असून त्याचे सारे श्रेय क्षेत्रिय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे आहे. तशाच प्रकारची उत्तम कामगिरी जनगणनेच्या कामातही महापालिका अधिकारी,कर्मचारी जबाबदारीने करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी प्रथमत:च डिजीटल पध्दतीने जनगणना होणार असून यामधील तांत्रिकी प्रक्रिया पूर्णपणे समजून घेऊन जबाबदारीने काम करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. या कार्यवाहीत उपलब्ध होणारा माहितीचा साठा महानगरपालिकेच्या योजना, धोरणे यांची अंमलबजावाणी करण्यासाठीही उपयोगी ठरणार असून हे काम नियोजित कालावधीत दैनंदिन कामांकडे लक्ष देऊन शिस्तबध्द रितीने पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शहर जनगणना अधिकारी तथा परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांनी जनगणनेचे राष्ट्रीय काम अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत 1872 मध्ये पहिली जनगणना झाली होती. ही जनगणना देशातील 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे असे सांगितले. या जनगणनेचे वैशिष्ट म्हणजे ही पहिली डीजिटल जनगणना असून यामध्ये मोबाईल ॲपव्दारे माहितीची नोंदणी होणार आहे तसेच पत्याचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घर यादी गटानुसार माहिती संकलित केली जाणार असून त्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरातील माहिती गांभीर्याने समजून घ्यावी असेही ते म्हणाले.
या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात सहा.संचालक जनगणना श्रीम. तेजल कटारे व सांख्यिकी विधी अधिकारी श्री. तुषार पाटील हे सादरीकरणाव्दारे जनगणना प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणार आहेत. आजच्या पहिल्या दिवशीचे प्रशिक्षण सत्र यशस्वीरित्या संपन्न झाले.