प्रतिनिधी : आज रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे पार पडलेल्या शिक्षक संमेलनात शेकडो शिक्षक-शिक्षकेतरांच्या उपस्थित मुंबईतील संस्था, संस्थाचालक, मुख्याध्यपक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर यांच्या हस्ते सावित्री फातिमा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
आठवा वेतन आयोग तात्काळ लागू करा. अन्यायकारक टीईटी सक्ती रद्द करा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करणारा संचमान्यतेचा जीआर रद्द करा.विषयाला शिक्षक द्या. अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा. शिक्षकांना शिकवू द्या. पेन्शनचा हक्क अबाधित ठेवा. रिक्त पदे भरा. या आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली एप्रिल महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी केली. राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव एकमताने मंजूर झाला.
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाला शिक्षक भारती संघटनेने पाठींबा दिला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात माजी आमदार कपिल पाटील यांनी कंत्राटीकरण आणि खाजगीकरणामुळे कामगार व शिक्षक-शिक्षकेतरांचे शोषण वाढल्याचे सांगितले. विनाअनुदानित आणि सेल्फ फायनान्स शाळांमधील समान काम आणि समान वेतन मिळावे. रिक्त पदांची भर्ती व्हावी. तसेच सर्व नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सभागृहाला सांगितले.
शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी एकत्रितपणे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा द्यावा असे आवाहन केले. त्याप्रमाणे दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होऊ लागल्याने पुढील वर्षी शिक्षक-शिक्षकेतर संमेलन एप्रिल महिन्यात घेण्यात येईल अशी माहिती दिली.
या कार्यक्रमात पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष राजेंद्र बोहाडे यांचा आदर्श संस्थाचालक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज, बालक एज्युकेशन सोसायटी, अंझा फांऊडेशन, विप्ला फांऊडेशन, सोसायटी फॉर द एज्युकेशन द चॅलेज, मुंबई या संस्थांचा आदर्श संस्था पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक यांचाही गौरव करण्यात आला. शिक्षक भारतीच्या सदस्या माधुरी मेटांगे यांची ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. शिक्षकेतरांचे मुंबईचे नेते देविदास पंडागळे यांना शिक्षक भारतीने विशेष पुरस्काराने सन्मानित केले अशी माहिती शिक्षक भारतीच्या मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांनी दिली.




