सज्जनगड(अजित जगताप) : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्या नजीकच्या परळी खोऱ्यातील सज्जनगडावर दासनवमी उत्सवानिमित्त भाविकांचा मेळा भरलेला आहे. महाराष्ट्र व प्रांतातून आलेल्या भाविकांच्या सुखसुविधांसाठीही मोठ्या प्रमाणात श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळ कार्यरत झाले आहेत.
समर्थ स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी सज्जनगडावर गर्दी केली आहे. भाविकांना सुलभ रीत्या दर्शन होत आहे. विविध साहित्याची दुकान सजली आहेत. मोठ्या प्रमाणात दासबोध व मनाचे श्लोक पुस्तिका, जपमाळा व इतर साहित्य खरेदी केली जात आहे.
बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दास नवमी उत्सवातील मुख्य दिवस असल्यामुळे सज्जनगडावर भाविकांनी गर्दी केली आहे. आबालवृद्ध अनेक जण शांततेने दर्शन घेत आहेत. तसेच दुपारी महाप्रसादाचे लाभ होत आहे. पहाटे दोन वाजता काकड आरती, चार वाजता श्री समर्थांच्या समाधीची महापूजा आणि सायंकाळी साडेसहा वाजता सांप्रदायिक भिक्षावळीचा कार्यक्रम होत आहे.
रात्री साडेदहा वाजता आरती आणि तेरा मंदिर मधील प्रदक्षिणा व छबिना व दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता समर्थ निर्वाण कथा रात्री साडेनऊ वाजता कीर्तन असे कार्यक्रम आहेत.
गेली दहा दिवसापासून उत्सव भरला आहे. भाविकांच्या शिस्तप्रिय व समर्थ रामदास स्वामी व मनाचे श्लोक पठण, शास्त्रीय गायन सेवा यामुळे या उत्सवाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. दोन संस्था परंतु, भाविकांच्या सुखसुविधीसाठी एका दिल्याने प्रयत्न होत आहेत. याची भाविक कौतुक करत आहे.
या ३४४ व्या दास नवमी साठी जय जय रघुवीर समर्थ… जय श्रीराम.. जयघोष सुरू झालेला आहे. सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळ अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, सौ .रसिका ताई ताम्हणकर , अभ्यंकर बुवा रामदासी, योगेश बुवा रामदासी, डॉ. अच्युत गोडबोले आदी मान्यवर व सेवेकरी सेवेचा लाभ देत आहेत.
——— ———- ——— ———- ——–
फोटो–




