विरार(विवेक पाटकर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यभरात सुरू असलेल्या विकासकामांना सामान्य जनतेने पसंती दिली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. आता वसई-विरारमध्येही विकासाच्या बाजूने नागरिक मतदान करून वसई-विरारमध्ये भाजपा-शिवसेना-श्रमजीवी, आग्रिसेना महायुतीचा निर्विवाद विजय होईल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज येथे केले.
वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्व येथील सेंट्रल पार्क गार्डन येथे भव्य जाहीर प्रचारसभा होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते. या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांची उपस्थिती होती.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील प्रत्येक व्यक्ती मतदान करणार आहे. मिनी विधानसभा निवडणूकीचा आता दुसरा टप्पा असून, पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपा हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. आता २९ महापालिकेतही भाजपाला यश मिळेल, असे भाकीत केशव उपाध्ये यांनी केले. मुंबईसह राज्यभरात विकासाची कामे सुरू असून, शहरांचा कायापालट होत आहे. भाजपा हा केवळ विकासाचा कार्यक्रम राबवित आहे. त्याला सामान्य नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, भाजपावर नागरिकांचा विश्वास वाढत आहे, असे प्रतिपादन केशव उपाध्ये यांनी केले.




