प्रतिनिधी : रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तसेच नागरिक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन म्हणून कार्यरत राहिलेले, कराड तालुक्यातील ज्येष्ठ सहकारी नेते जयसिंगराव (बापू) पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार चळवळीतील एक पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे. बापू हे उंडाळकर कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य असून, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे बंधू होते. कराड दक्षिण मतदारसंघातील राजकारण, सहकार क्षेत्र आणि सामाजिक चळवळींवर उंडाळकर कुटुंबाचे अधिराज्य गाजले असून, त्या परंपरेत बापूंचे योगदानही उल्लेखनीय राहिले आहे. बापू यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत सहकार क्षेत्रातून उपाययोजना राबवल्या. रयत साखर कारखाना हे त्यांच्या कार्यकाळात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. तसेच खेड्यापाड्यांतील आठवडी बाजारांना सामाजिक संवादाचे केंद्र म्हणून जपले. बाजारात भेटणाऱ्या सर्वांशी आत्मीयतेने संवाद साधणारे, लोकांमध्ये एक वेगळी छाप निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनाने कराड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते जयसिंगराव (बापू) पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
“बापूंचे जाणे म्हणजे एका सहकारी पर्वाचा अंत”, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.
RELATED ARTICLES