मुंबई(रमेश औताडे) : राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
जनता दल (सेक्युलर)च्या पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक मुंबईत पार पडली तेव्हा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी जनता दल (से.) महायुतीचा घटक पक्ष म्हणून ताकदीने निवडणुका लढवेल असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यासोबतच पुढील महिन्यात भारताचे माजी पंतप्रधान व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या मुंबई दौऱ्याच्या तयारीबाबतही चर्चा करण्यात आली. त्यांच्या जंगी स्वागताचे आयोजन आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, सलीम भाटी, ज्योती बडेकर, युवा नेते ॲड. संग्राम शेवाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.