मुंबई – दादर, परळ, बोरीवली, लालबाग, दवा बाजार यांसारख्या ठिकाणी गेली अनेक दशके प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाया सुरू असल्याच्या निषेधार्थ १५ जुलै २०२५ रोजी संयुक्त फेरीवाला महासंघाच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन करण्यात आले. आझाद मैदानात हजारो फेरीवाले सकाळी १० पासून रात्री ८ वाजेपर्यंत ठिय्या देऊन बसले होते.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
- दादरसह मुंबईभर सुरू असलेल्या महापालिकेच्या व पोलिसांच्या कारवाया थांबवाव्यात.
- केंद्र सरकारचे फेरीवाला धोरण अंमलात आणावे.
- पर्यायी जागा न देता फेरीवाल्यांवर कारवाई करू नये.
- शिस्तबद्ध व्यवसायासाठी महानगरपालिका धोरण ठरवावे.
- हॉकर झोन तयार करून पात्र फेरीवाल्यांना तात्काळ जागा द्यावी.
- १५-५० वर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना पात्र घोषित करून लायसन्स द्यावे.
- नवीन अपात्र फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवावे, डोमिसाइल निकष लागू करावेत.
- स्थानिक शेतकरी आणि महिला विक्रेत्यांसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकाजवळ विशेष “शेतकरी झोन” निर्माण करावा.
- वयोवृद्ध व महिलांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावावी.
संयुक्त महासंघाचे समन्वयक बाबुभाई भवानजी व संजय यादवराव यांनी म्हटले की, “आम्ही शिस्तबद्ध व्यवसायासाठी तयार आहोत. पण पर्यायी जागा न देता, रात्री-अपरात्री आमचा संसार उध्वस्त करणे अन्यायकारक आहे. सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा हे आंदोलन तीव्र रूप धारण करेल.”असा सरकारला इशारा दिला आहे.
मुंबईतील सामान्य गरिबांचा आधार असलेल्या फेरीवाल्यांचा आवाज सरकारने ऐकण्याची गरज आहे, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून दिला गेला.