म
ेढा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाबळेश्वर जावळी खोऱ्याने अनेक क्षेत्रांमध्ये आघाडी घेतली आहे. जुन्या जाणत्या दूरदृष्टीच्या नेत्यांनी पायाभरणी केल्यामुळे अर्थकारणात पन्नास वर्षापासून ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. सर्वांसाठी एक आणि सर्वांसाठी एक हे ब्रीदवाक्य घेऊन बँक पूर्वी सामान्य सभासदाकडेही लक्ष देत होते. परंतु, सध्या जावळी बँकेची वार्षिक सभा म्हणजे औपचारिकता ठरू लागलेले आहे. तेच राजकीय नेते.. तेच वाजंत्री आणि तेच टाळ्या वाजवणारे असं त्याचे चित्र जुन्या जाणत्या सभासदांना वेदनादायक ठरत आहेत.
आदरणीय ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी पाचगणी शेजारील दांडेकर येथून मुंबईत पाऊल टाकताना आर्थिक कोंडी अनुभवली. त्यातूनच सहकारी बँकेचे स्वप्न पाहिले. आदरणीय भिकू दाजी भिलारे गुरुजी तसेच पाचगणी, भिलार ,महाबळेश्वर, तापोळा, बामणोली , कुसुंबी,कुडाळ, मेढा ,करहर, केळघर, सायगाव, आनेवाडी भागातील मुंबई स्थित माथाडी, हमाल, हातगाडीवाले आणि लघुउद्योग करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सुपुत्रांना एकत्र करून दिनांक ११ जुलै१९७३ रोजी जावळी बँकेची स्थापना केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वातंत्र्य सैनिक किसनवीर आबा, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, अण्णासाहेब पाटील, लालसिंगराव शिंदे, जी. जी. कदम, डी. बी. कदम, अभयसिंहराजे भोसले यांच्या भक्कम पाठिंब्यावर जावळी बँकेची प्रगती सुरू झाली.
सध्या २४ शाखेतून १३२० . ६० कोटी रुपयाचे आर्थिक डोलारा समर्थपणे सांभाळला जात आहे. याचे सर्व श्रेय बँकेचे संचालक अधिकारी कर्मचारी आणि विश्वास ठेवणारे सभासदांना आहे. कारण,५३,४८३ सभासदांनी जावळी बँकेवर विश्वास संपादन करून हस्तक्षेप केला नाही. पण आता राजकीय पटलावर , वारीला आणि रंगीत संगीत कार्यक्रमाला तीच मंडळी,,, तीच वाजंत्री,,, आणि तेच कौतुक करणारे शब्द,,, याचा वीट आलेला आहे.
एके काळी जावळी सहकारी बँकेची वार्षिक सभा म्हणजे जावळी बाबळेश्वर तालुक्यातील खेड्यापाड्यातील गावकऱ्यांचा मेळावा वाटत होता. एकमेकांची आपुलकीने विचारपूस केली जात होती. गुणवानांचा गौरव केला जात होता. त्याचबरोबर एकमेकांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपुलकीने आपलेपणा दाखवून दिला जात होता. आता ५२ वर्षात पदार्पण करताना फक्त औपचारिकता दिसून आलेली आहे.
तू कर मारल्यासारखं.. मी करतो रडल्यासारखे आणि पुन्हा आपण एकमेकांचे कौतुक करून सभासदांवरही वार्षिक सभेचा खर्च लावू. असा एक कलमी कार्यक्रम सुरू झालेला आहे. हे आता उघडपणे झाल्यामुळे जुने जाणते सभासद तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत.
ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांचा शब्द म्हणजे आदेश होता. आता ज्यांच्या हाती बँकेची सत्ता त्यांना आता सर्व क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढीस लागला आहे. नको असलेल्या जुन्या संचालक व सभासदांना खड्यासारखं बाजूला केले जात आहे. एवढेच नव्हे तर जावळी सहकारी बँकेच्या वार्षिक सभेचे नोटीस किंवा अहवाल देण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. बँकेची निवडणूक आली की अशा सभासदांची आठवण होते. मतदारांना आणण्यासाठी गाड्या पाठवल्या जातात. पण वार्षिक सभेचा निरोप देणे शक्य होत नाही. अशा तक्रारी वाढू लागलेले आहेत.जे बँकेचे ठेवी वाढवतात अशा काही संचालकांचे तर वार्षिक अहवालातील फोटो शोधावे लागतात.यावर आता जुन्या सभासदांनी पर्यायी वार्षिक सभा घेण्याची मानसिकता ठेवली असल्याचे बोलले जात आहे.
कोंबडा किती जरी झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो एक दिवस आरवतोच जावळी बँकेबाबत असं घडू नये. यासाठी आता आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. दादर येथे झालेल्या ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला किती सभासद हजर होते ? दादर परिसरात त्यावेळेला महाबळेश्वर- जावळी तालुक्यातील अनेक बँकेचे सभासद विविध कारणाने उपस्थित असताना सुद्धा या वार्षिक सभेकडे फिरकले नाहीत. त्याचा कधीतरी विचार करावा लागणार आहे.
दहा कोटी नफा झाला ही आनंदाची बाब आहे. कामकाज अनेक सर्व यंत्रणा सक्षमरीत्या काम करत आहे. त्यांचेही कौतुकच आहे. जावळी बँकेसाठी परिश्रम घेणाऱ्या सभासदांनी कधीही विरोधाला विरोध न करता शांत बसणे म्हणजे आम्हाला सर्व पटत आहे. असं कोणी समजू नये. असा इशारा दिलेला आहे. हा संदेश आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जावळी सहकारी बँकेच्या सभासदांपर्यंत पोहोचलेले आहे. याचा विचार व्हावा. अशी ह विनंती केली आहे.
______________________________
फोटो– जावळी सहकारी बँकेच्या वार्षिक सभेची तयारी व ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे