कोरेगाव(अजित जगताप) : भारत देशात अस्पृश्यता निर्मूलन होण्यापूर्वी शिवता शिवत होती. परंतु, आता अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली आहे. जमिनीला वाढते भाव आले आहेत. त्यामुळे महार व देवस्थान इनामी जमीन नंतर आता मागासवर्गीय यांच्या शौचालयावर ही डल्ला मारण्याची प्रवृत्ती शिरढोण ता कोरेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत दिसून आली आहे. याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी शिरढोण ता. कोरेगाव येथील मागासवर्गीय यांच्या सुशिक्षित असलेल्या शौचालयाच्या नुकसानीबाबत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती अशी की, शिरढोण तालुका कोरेगाव येथील समाज कल्याण विभागाने चर्मकार- मातंग- बौद्ध समाजातील लोकांसाठी चार महिलांसाठी व चार पुरुषांसाठी शौचालय बांधले होते. या शौचालयाला स्वच्छतेसाठी पाण्याची जोडणी देऊन ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात हातभार लावला होता. परंतु, याच गावातील ग्रामस्थ सूर्यकांत वसंत घोरपडे यांनी सदरचे मागासवर्गीय यांसाठी असलेले शौचालय जमीन दोस्त करून त्यावर मालकी हक्क सांगितला आहे.
सदर जमिनीचा त्यांच्याकडे लेखी स्वरूपात कोणताही पुरावा नाही. विशेष बाब म्हणजे सदरच्या शौचालयाची मालकी शिरढोण ग्रामपंचायतकडे असताना सुद्धा ग्रामपंचायतीने फारसं लक्ष दिले नाही. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याऐवजी साधी अदखलपात्र नोंदकरून संबंधिताला पाठीशी घालण्यासाठी प्रयत्न केले आहेत. असा आरोप करण्यात येत आहे.
सदर शौचालय पावसाळ्याच्या दिवसातच पाडल्यामुळे गावातील मातंग- चर्मकार- बौद्ध समाजातील महिला व पुरुष मंडळी उघड्यावर नैसर्गिक विधी करून आरोग्याला घातक अशी कृत्य करत आहेत. पर्याय नसल्यामुळे ते असे वागत असले तरी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्याबद्दल त्यांचेवर गुन्हा दाखल होऊ शकतो. याची त्यांना जाणीव झाल्यामुळे त्यांनी सार्वजनिक शौचालय पाडल्याची तक्रार केली आहे. सदर घोरपडे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा नुसार कारवाई व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
आज सातारा जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश घुले यांची ग्रामस्थ व श्री रमेश उबाळे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनाही सदर बाब घडल्याचे नवल वाटले. माणुसकीला काळिंबा फसणाऱ्या या कृत्याबद्दल त्यांनी तातडीने दखल घेतली. व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने त्वरित कारवाई व्हावी व त्याचा अहवाल प्राप्त करून द्यावा असे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांनी व श्री उबाळे यांनी त्यांना धन्यवाद दिले. याबाबत ठोस कारवाई न झाल्यास २४ जून २०२५ रोजी सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिरढोण मागासवर्गीय व पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शेकडो कार्यकर्ते तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करतील. असाही इशारा देण्यात आलेला आहे.
______________________
फोटो– सातारा जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देताना श्री उबाळे व ग्रामस्थ (छाया — निनाद जगताप सातारा)