ठ
ाणे : तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर आपल्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना आहे टोमणेसम्राटांची नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. सांगली जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, दिपाली सय्यद उपस्थित होते.चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात. पैलवान पाटील हे कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. चंद्रहार पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे, असे ते म्हणाले. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. पण अजूनही काहीजणांना पचनी प़डत नाही. त्यांची पोटदुखी दूर करण्यासाठी राज्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केलाय. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथं कोणी मालक नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे मात्र त्यांच्यानंतर काही लोक अहंकारामुळे सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.ते पुढे म्हणाले की, पहलगामध्ये आपल्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम पाकिस्तानने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला. सरकारची सात शिष्टमंडळे जगभरात गेली आणि त्यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प चंद्रहार पाटील यांनी केलाय. त्यांची देशभक्ती पाहता दिल्लीत काय काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेत आला आहात तुमची जबाबदारी वाढली आहे. घराघरात शिवसेना पोहोचवायची आहे, असे ते म्हणाले.पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.ते पुढे म्हणाले की, दिलेला शब्द पाळणारा जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा राजकारण- समाजकारण बदलते. जेव्हा उठाव झाला त्यानंतर राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आणले. दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचे काम गेली अनेक वर्ष करतोय, त्यामुळे लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढतोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अनिल बाबर हे सुरुवातीपासून सोबत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो तरी तिथे अनिल बाबर यांची माणसे आहेत. पूर्ण देश व्यापून टाकलेले अनिल बाबर आज आपल्यात नाहीत मात्र त्यांचे काम पुढे नेण्याचे काम आमदार सुहास बाबर करत आहेत, असे ते म्हणाले.
टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका; डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
RELATED ARTICLES