विशेष प्रतिनिधी : गावपातळीवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हातभट्टी दारूधंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. गावात सुरू असलेल्या हातभट्टी दारूची माहिती असूनही ती लपविणाऱ्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटलांवर थेट कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिला आहे.
गावपातळीवरील अवैध दारूधंदे पूर्णपणे बंद करण्याची जबाबदारी आता स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर असेल.
गावात कुठेही हातभट्टी तयार होत असल्यास किंवा विकली जात असल्यास, त्याची माहिती तात्काळ वरिष्ठ पातळीवर देणे बंधनकारक आहे. माहिती लपवल्याचे समोर आल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
अवैध व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.




