ताज्या बातम्या

राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

मुंबई : पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. १६) लोकभवन, नागपूर येथे अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रकल्पाची क्षमता ९० किलोवॅट असून त्यातून दरवर्षी सुमारे १,१५,२०० युनिट्स स्वच्छ वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे.

“हरित ऊर्जा हीच भविष्याची गरज” – राज्यपाल

सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करताना राज्यपालांनी हरित ऊर्जा हीच भविष्याची गरज असून अशा प्रकल्पांमुळे केवळ पर्यावरणाचे संरक्षण होत नाही, तर ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठीही मोठी मदत होते, असे सांगितले.

नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात अशा प्रकल्पांमुळे इतर संस्था आणि नागरिकांनाही नवीकरणीय ऊर्जेकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होणार आहे. तसेच वीज बिलात बचत होऊन दीर्घकालीन आर्थिक फायदा होणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले यांचेसह मेडाच्या अधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या अभियंत्यांनी केली.
या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे खासगी सचिव पवन सिंह, राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले, विभागीय महाव्यवस्थापक (महाऊर्जा) सारंग महाजन तसेच अभियंते अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वैशिष्ट्ये
अत्याधुनिक तंत्रज्ञान: SolarEdge (DC Power Optimizer) तंत्रज्ञानाचा वापर, ज्यामुळे प्रत्येक सोलर पॅनेलचे स्वतंत्र निरीक्षण शक्य
वाढीव कार्यक्षमता: सावली, धूळ किंवा एखाद्या पॅनेलमध्ये बिघाड झाला तरी संपूर्ण प्रणालीवर परिणाम होत नाही
रिअल-टाइम मॉनिटरिंग: वीज निर्मितीची प्रत्यक्ष वेळेत पाहणी करण्याची सुविधा

Scroll to Top