कराड(प्रताप भणगे) : उंडाळे ते तुळसण या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्त्याभर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गाचे नुतनीकरण पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून करण्यात आले होते. मात्र, सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जागोजागी खड्डे पडले असून, शेवटचा थर म्हणजे कार्पेट केवळ २ इंचाचा टाकल्याने खडी बाहेर आलेली आहे.
या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांसाठी पाण्याखाली खड्डे न दिसल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे. तसेच या साचलेल्या पाण्यामुळे आजार फैलावण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, कराड दक्षिण यांनी या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवण्याचे आणि संपूर्ण रस्त्याची गुणवत्ता तपासण्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून जोर धरत आहे.