कवठे(विजय जाधव) : गावाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे. यात १०० गुणांकन मिळवण्यासाठी असलेली स्पर्धा नसून गावाचा सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. आता ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साऱ्या कवठे गावाने संकल्प करावा, असे आवाहन विजय जाधव यांनी केले. यावेळी भैरवनाथाच्या मंदीरात ग्रामसभेला उपस्थित असलेल्या महिला, ग्रामस्थांनी या अभियान स्पर्धेत उतरण्याचा संकल्प केला.
वाई तालुक्यातील कवठे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सरपंच मंदाकिनी पोळ यांच्या अध्यक्षतेखाली
भैरवनाथ मंदिरात ही ग्रामसभा पार पडली. या सभेला पत्रकार विजय जाधव यांनी संपूर्ण अभियानातील ८ घटक विषयांवर मुद्देसूद माहिती देऊन त्यासाठी लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी करण्याविषयी प्रभावी माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांनी चर्चा करून या अभियानात साऱ्या कवठे गावाने सहभागी होऊन पुरस्कारासाठी सर्वोत्तम योगदान देऊ या, असा संकल्प केला.
सरपंच मंदाकिनी पोळ यांनी अभियानात यशस्वी होऊन आपल्या गावाची आदर्श ओळख निर्माण करु या,”असे आवाहन केले.
यावेळी नुतन शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. वृषसेन पोळ, उपाध्यक्ष निलम पोळ यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक उपसरपंच शिवाजीराव डेरे यांनी तर आभार आदर्श शेतकरी राहुल डेरे यांनी मानले. ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब कोचले यांच्यासह मोठ्या संख्येने कवठे ग्रामस्थ, महिला,युवक उपस्थित होते.