प्रतिनिधी : मुंबईतील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या कच-यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुंबईकर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा. जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत, पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू राहिल, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नदी व मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणांना भेट दिली. तसेच, नदी व नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी दौऱ्याला उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गगराणी म्हणाले की, नालेस्वच्छतेची, गाळ काढण्याची कामे समाधानकारकरित्या होत असली तरी आजुबाजूच्या वस्त्यांमधील नागरिक प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये टाकतात. नाल्याच्या दुतर्फा राहणा-या नागरिकांनी, मुंबईकर नागरिकांनी नाल्यांत घनकचरा, टाकाऊ वस्तू ,प्लास्टिक वस्तू टाकू नयेत. महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन गगराणी यांनी केले.