मुंबई – सांताक्रुझ (प.) येथील जुहू तारा रोड, किशोर कुमार गांगुली मार्गावरील ‘एकता रहिवासी संघ’ परिसरात राहणारे आयु. सुहास धर्माजी कदम यांनी आपल्या वस्तीतील काही महिलांवर जातीय द्वेषातून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गेल्या ३० वर्षांपासून त्या परिसरात एकमेव बौद्ध कुटुंब म्हणून राहणाऱ्या कदम यांच्या मते, स्थानिक महिलांनी जो मुलगा व्यसनाधीन आहे, त्याचा गैरफायदा घेत त्यांचे घर विकण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. या महिलांनी अनेक वेळा त्यांना शिवीगाळ, दमदाटी, आणि पाहुण्यांवर हल्ला करण्याचे प्रकार केले असून, आमदार निधीतून आलेल्या पाणीपुरवठा लाईनचीही तोडफोड केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संतप्त कदम यांनी असा दावा केला की, या जातीय मानसिकतेतून प्रेरित महिलांनी त्यांच्यावर हल्ल्याचे आणि घरातून हकालपट्टीचे षडयंत्र रचले असून, पोलीस तक्रारी करूनही सांताक्रुझ पोलीस स्थानकाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस विभागावर राजकीय दबाव असल्याने संबंधित आरोपींवर कारवाई टाळली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
कदम यांनी मागणी केली आहे की, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित महिलांवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) कठोर कारवाई करण्यात यावी आणि मुंबईत जातीय तणावाला आळा घालावा.अशी मागणी सुहास कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.