
मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विधानसभेतील सात आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यापूर्वी दोन आमदारांनी दिलेला राजीनामा व चार आमदारांचे निधन यामुळे विधानसभेच्या सध्या चौदा जागा रिक्त होतील.
विधानसभा सदस्य असलेले प्रणिती शिंदे, बळवंत वानखडे, रवींद्र वायकर, निलेश लंके, वर्षा गायकवाड, संदीपान भुमरे, प्रतिभा धानोरकर हे आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे हे सदस्य आमदारकीचा राजीनामा देतील. यातील काहींनी राजीनामा दिल्याचंही समजतंय. तर, यापूर्वी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण व राजू पारवे यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये तर राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. गोवर्धन शर्मा, राजेंद्र पटणी, अनिल बाबर व पी. एन. पाटील यांचे निधन झाल्याने चार जागा रिक्त आहेत. तर काँग्रेसचे सुनील केदार अपात्र झाल्यामुळे त्यांची जागाही रिक्त आहे.