कराड (अजित जगताप) : भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना लोकशाहीचा अधिकार दिला आहे. त्यामुळे त्यांना समता- स्वातंत्र्य- बंधुत्व व हक्क मिळाले आहेत. त्याचबरोबर मतदानाचा अधिकार मिळाला आहे. हा अधिकार बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. अशी मनाशी ठाम निश्चय केलेले पेरले ता कराड येथील उच्च विद्या विभूषित तरुण जयेश चव्हाण व सौ . आसावरी चव्हाण यांनी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी अमेरिकेतील टेक्सास शहर ते कराड तालुक्यातील पेरले मतदान केंद्र असा प्रवास करून मतदानाचा अधिकार बजावला आहे. या त्यांच्या भूमिकेमुळे अनेकजण त्यांचे मनापासून कौतुक करत आहेत. पेरले तालुका कराड येथील स्वातंत्र्य सैनिक महादेव शिवराम चव्हाण यांचे नातू असलेले व सहकार क्षेत्रातील महामेरू व राजकीय विश्लेषक जयसिंगराव चव्हाण -पेरलेकर यांचे सुपुत्र असलेल्या श्री जयेश चव्हाण व सो आसावरी चव्हाण हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून अमेरिकेतील टेक्सास शहरात गेले दहा वर्ष नोकरी निमित्त वास्तव्य करत आहेत .परंतु, भारत देशाबद्दल असलेला अभिमान व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणी प्रमाणे संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचा वापर करण्यासाठी आज स्वखर्चाने ते टेक्सास शहरातून विमान व चार चाकी वाहनाने पेरले येथील मतदान केंद्रात आले. कोणताही मोठा गाजावाजा व बडेजावपणा न करता अत्यंत साध्या पद्धतीने मतदार म्हणून त्यांनी पेरले येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदान केले. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, वाई- खंडाळा- महाबळेश्वर ,सातारा, जावळी, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघात एकूण ६३.१६ टक्के एवढे मतदान झाले आहे. काहीजण शहरात व गावात असूनही मतदान करण्यासाठी आले नाहीत. त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रकार सुशिक्षित व विद्याविभूषित चव्हाण कुटुंबीयांनी केला असल्याची प्रतिक्रिया लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या अनेकांनी दिलेली आहे. वास्तविक पाहता मतदान करण्याचा अधिकार ज्यांनी प्राप्त केला आहे. त्यांना आता देशाच्या समस्या व देशाच्या विकासाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्या अर्थाने चव्हाण कुटुंबीयांनी अधिकार प्राप्त केलेले आहे. त्यांच्या या भूमिकेचे अनेक मान्यवरांनी मनापासून स्वागत केले आहे. दरम्यान ,संविधान धोक्यात आले असले तरी परदेशात वास्तव्य करूनही आपल्या माय भूमीतील अनेक घडामोडी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला समजावे. यासाठी ते इंटरनेटच्या द्वारे सातारा जिल्ह्यातील व देशभरातील घडामोडी कडे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या या अभ्यासची वृत्ती खऱ्या अर्थाने लोकशाही व भारताच्या विकासाबाबतची भूमिका स्पष्ट होताना दिसत आहेत .त्यांचे अनेक मान्यवरांनी मनापासून अभिनंदन केले आहे.
