मुंबई : जम्मू-काश्मीर सीमेवर सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात मुंबईतील जवान मुरली श्रीराम नाईक यांनी वीरमरण पत्करले. पहाटे 3 वाजता पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी शौर्याने सामना करत प्राणाचे बलिदान दिले.
मुरली नाईक हे घाटकोपरच्या कामराज नगर येथील रहिवासी होते. मूळ आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी असलेल्या नाईक कुटुंबाने काही वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक होत जीवनाची नवी सुरुवात केली होती. कामराज नगरमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या या कुटुंबाला पुनर्विकासाच्या काळात स्थलांतरित व्हावे लागले असून सध्या ते आंध्र प्रदेशात परतले आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरु केला. या चकमकीत मुरली नाईक यांच्यासह दुसरे जवान दिनेश शर्मा हेही पूँछ सेक्टरमध्ये शहीद झाले. शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शहीद मुरली नाईक यांच्या निधनाने घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या शौर्याला मान देत वॉर्ड क्रमांक 133 मध्ये बॅनर लावून श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडियावरून भावनिक श्रद्धांजली वाहत म्हटले, “देशासाठी बलिदान दिलेल्या मुरली नाईक यांना मी मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. नाईक कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत.”
दरम्यान, पीडीपी अध्यक्षा महबुबा मुफ्तींनीही युद्धजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सांगितले की, “सीमावर्ती भागातील लोक रोजच्या संघर्षात होरपळत आहेत. आता हे युद्ध थांबले पाहिजे.” त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
मुरली नाईक यांच्या बलिदानाने देश पुन्हा एकदा शौर्य व समर्पणाच्या भावनेने नतमस्तक झाला आहे. अशा वीरांना संपूर्ण देशाची मानवंदना.