
मुंबई(अजित जगताप ) : लाडकी बहीण व जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पद सांभाळले आहे.
साथीने घासून पुसून नव्हे तर
ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी
बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
आहे, मी आनंद दिघे यांचा चेला आहे,
असा स्वस्तात परत जाणार नाही. मी
मैदानातून पळणारा नाही, तर लोकांना
पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक कधीच मैदान सोडत नाहीत. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, असा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद
मैदानात झालेल्या शिवसेनेच्या दसरा
मेळाव्यात दिला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मान्यवरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना दोन मिनिटे उभे राहून सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर मान्यवरांनी विशेषता ज्योती वाघमारे ,गुलाबराव पाटील, रामदास भाई कदम यांनी थोडक्यातच आपले मनोगत व्यक्त करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. कोरोना काळात बंगल्यात बसून कामकाज करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांचे सुखदुःख माहीत नाही. आम्ही पीपी किट लावून लोकांच्या आरोग्यासाठी धावत होतो.’जिथे टेंडर, तिथे सरेंडर’ हे ठाकरेंचे धोरण होते.
कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी होती. धारावीचा, मुंबईचा विकास होईल हे सगळे मी पाहतोय. धारावीतील
प्रकल्पात काड्या घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धारावीकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही २ लाख १० जणांना घरे देणार, पात्र-अपात्र बघणार नाही. २लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे
स्वप्न आम्ही पूर्ण करणार, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकरी बळीराजा हे आपले अन्नदाता आहेत.त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही करतआहोत. माता-भगिनी यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत. या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा शेतकऱ्यांचा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्हाला शेतकऱ्याचा मुलगा का पचत नाही ? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही आलो. हे
सगळे डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान राहील याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
विरोधकांनी माझ्यावर माझ्या दाढीबावत टीका केली. पण याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्ध्वस्त केली.
मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला.
मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करा,म्हणत ते फिरत आहेत. दिल्लीच्या घरोघरी कोण फिरत आहे
आपल्याला माहीत आहे. तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा चालत नाही, जनतेला कसा चालेल.फेसबुक लाइव्हच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केले ते
सांगा. कोरोनाच्या काळात घोटाळा केला. इकडे लोक मरत होते आणि तुम्ही पैसे मोजत होतात, कुठे फेडाल हे पाप ?, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांसाठी खास समोसे व पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली होती. तसेच यावेळी काहींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.