पनवेल (अमोल पाटील) : राज्यातील अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभर सुरू असलेल्या तपासणी मोहिमा, अचानक धाडी आणि नियमभंग करणाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
विशेषतः पान टपऱ्या, हॉटेल्स, फास्टफूड सेंटर, चायनीज गाड्या, बेकरी, थंडपेय विक्रेते, मेडिकल स्टोअर्स तसेच खाद्यपदार्थांशी संबंधित विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. खाद्यपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, परवाने, मुदतबाह्य वस्तूंची विक्री, अन्न साठवणुकीची पद्धत आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन होत आहे की नाही, याची कसून पडताळणी केली जात आहे.
तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून काही ठिकाणी माल जप्त करण्याची कारवाईही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे व्यापारी वर्गात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांमधील स्वच्छता सुधारण्यास, आवश्यक परवाने अद्ययावत ठेवण्यास आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात केली आहे.
या कारवाईचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात काही पान टपऱ्या, हॉटेल्स, चायनीज सेंटर आणि मेडिकल स्टोअर्स काही काळासाठी बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. तपासणीच्या भीतीमुळे अनेकांनी स्वतःहून नियमांचे पालन करण्यासाठी पावले उचलल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त किंवा अस्वच्छ वातावरणात तयार होणारे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याने ग्राहकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फायदा होणार असून अवैध व बेकायदेशीर पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राज्यात अन्न सुरक्षा आणि औषध विक्री संदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणी मोहिमा आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांचे धाबे आणखी दणाणण्याची चिन्हे दिसत आहेत.




