
सातारा(अजित जगताप) : मराठी माणसांच्या हक्कासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. तसेच कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा एक प्रतिकात्मक दिवस म्हणून एक मे हा दिन महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या ऐतिहासिक दिनाची जोरदार तयारी साताऱ्यात सुरू आहे.
गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम व महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. सकाळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शाहू क्रीडा मैदानावर शासकीय कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व अनेक शासकीय कार्यालयामध्ये विद्युत रोषणाई व स्वच्छता मोहीम तसेच सजावट करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय कार्यालयातील स्त्री पुरुष चतुर्थ श्रेणी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. तसेच यानिमित्ताने ठेकेदारी पद्धतीने काम करणारे अनेक कर्मचारी सध्या साफसफाईच्या कामाकडे लक्ष केंद्रित करत आहेत. जागतिक कामगार दिनाच्या दिवशी कोणतेही कामगाराला कामावर बोलवले जाऊ नये. ची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात १ मे ही तारीख अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वाची आहे. १ मे १९६० रोजी ‘मुंबई पुनर्रचना कायद्या’नुसार मराठी भाषिक लोकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हून अधिक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आणि अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य निर्मितीचे स्वप्न पूर्ण झाले.
हा दिवस मराठी अस्मिता, संस्कृती आणि राज्याच्या भाषिक स्वाभिमानाचे प्रतीक आहे. या दिवशी राज्यभर सुट्टी असते आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. एक मे हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ किंवा ‘मे दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनांचे स्मरण करतो.
१ मे हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा (राज्य निर्मिती) आणि गौरवाचा (कामगार दिन) दिवस आहे.
_________________________________
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील विद्युत रोषणाई व साफसफाई (छाया– निनाद जगताप, सातारा)




