सातारा(अजित जगताप ) : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला भाजपने सातारा पोलीस यंत्रणा हाताशी धरून नाट्यमय घटना घडवल्याने महाराष्ट्रात चर्चा झाली. त्याच्या खुणा कायम असतानाच आज शनिवारी दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादी व शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी निषेधार्थ घोषणा देऊन या निवडीवर बहिष्कार घातला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांनी बहिष्कार घालण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ ठरलेली आहे.
याबाबत माहिती अशी की दिनांक गेल्या महिन्यात शुक्रवारी मार चवदार दिनाच्या शुभमुहूर्तावर दि:२० मार्च रोजी सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळेला राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलीस यंत्रणेला हाताशी धरून मतदानापासून वंचित ठेवले होते. त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्या दोन सदस्यांना कोंडीत पकडले. त्याची विधिमंडळातील अधिवेशनात चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीचे आदेश द्यावे लागले. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने मिळवलेल्या अध्यक्ष पदापेक्षाही त्यांच्या राजकारणाबाबत समाज माध्यमावर टीका टिपणी झाली.
भाजपच्या निष्ठावंत गटामध्ये सुद्धा काही प्रमाणात नाराजी पसरली होती. शुक्रवारी २० मार्च रोजी नाट्यमय राजकारण आणि शनिवारी दिनांक ४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी बहिष्कार घातला. या दोन्ही घटनांमध्ये भाजपच्या राजकीय वाटचालीचा आरसा ठरलेला आहे. सातारा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशानी नागराजन, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज विषय समितीच्या सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या निवडीच्या वेळेला राष्ट्रवादी व शिवसेना सदस्यांना सभागृहामध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही हा नियम सांगून सभागृहात जाण्यास रोखले. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निषेधाच्या घोषणा तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. सभागृहात काळ्याफिती लावून सदस्यांनी निषेध नोंदवला. एवढ्यावरच सातारा जिल्हा परिषद सदस्य थांबले नाहीत तर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच निषेध नोंदवून सभा त्याग केला.
महाराष्ट्राच्या इतिहासात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संबंधात निषेध नोंदवून जिल्हा परिषद सदस्यांनी सभा त्याग करण्याचा हा पहिल्यांदाच प्रकार घडल्यामुळे भाजपची पूर्णता नाचक्की झाल्याचे मान्यता येत आहे. दरम्यान, या गोधळानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री संतोष पाटील यांनी नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया सांगून प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे समाज कल्याण सभापती पदावर भाजपचे ऋषिकेश धायगुडे पाटील, महिला व बालकल्याण सभापती पदी ऋतुजा शिंदे व शिक्षण व अर्थ समिती तसेच कृषी सभापती पदासाठी सौ . तेजस्विनी कदम व राष्ट्रवादीच्या बंडखोर सौ. लता कर्णे यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले
या निवडीनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, डॉ. आ. अतुल भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जि प अध्यक्ष डॉ. प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नूतन सभापतींचे स्वागत करून सन्माननीय त्यांना सभापती पदाच्या खुर्ची आसनस्थ केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांना दिलेल्या यादीनुसार ठराविक पत्रकारांनाच प्रवेश मिळाला. इतरांना सातारा जिल्हा परिषद इमारतीमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. कायदा व सुव्यवस्था कशा पद्धतीने राखली जाते? याचीच प्रचीती यावेळी आली. दिनांक २० मार्च रोजी घडलेल्या घटनेमुळे आता पोलिसांनी सुद्धा कर्तव्यदक्षतेने बंदोबस्ताचे काम पाहिले. या निवडीचे वेळेला कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही. कारण गेल्या वेळच्या घटनेमुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाल्यामुळे अनेकांना सावध भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र दिसत होते.
मोबाईल विना सदस्य
सातारा जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडीच्या वेळेला पोलिसांनी सर्वच सदस्यांचे मोबाईल जप्त करूनच त्यांना प्रवेश दिला. त्यामुळे सुमारे दीड तास मोबाईल विना सर्वजण सभागृहात थांबले होते. हातात मोबाईल नसल्यामुळे अनेकांची चुळबूळ सुरू होती. मोबाईल नसणे म्हणजे काय आहे? चा अनुभव अनेकांनी घेतला त्यामुळे निवडीनंतर मोबाईल घेण्यासाठी चांगलीच झुंबड उडली होती.





