सातारा : पाटण पंचायत समितीच्या सदस्यांनी लोकहिताची व कल्याणकारी कामे करून जनतेला दिलासा द्यावा. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी व जनता दरबारच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाटण पंचायत समितीला भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, पंचायत समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती विजय पवार, गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्यासह पंचायत समितीमधील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
पंचायत समितीमध्ये काम करताना सदस्यांनी गटतट विसरून सर्वांच्या हिताची कामे करावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवावा. तक्रारी कमी होण्यासाठी शिस्तबद्ध काम करावे. प्रत्येक महिन्याला कामांविषयी आढावा घ्यावा. तसेच प्रत्येक सोमवारी विभागप्रमुखांनी कार्यालयात हजर राहिलेच पाहिजे आणि नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या तक्रारी तुमच्या स्तरावर सुटत नसतील, त्या जिल्हास्तरावर सोडवण्यात येतील.
पंचायत समितीच्या सदस्यांनी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी करावी. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या टेबलवर नेमप्लेट लावावी. तसेच कुठला विभाग कोणत्या दिशेला आहे याचे दिशादर्शक फलक लावावेत. पंचायत समितीच्या सदस्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे. पालकमंत्री म्हणून निधीबाबत पाटण पंचायत समितीसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
पाटण शहरांतर्गत रस्ते कामांचा आढावा
पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाटण शहरांतर्गतच्या रस्त्यांच्या कामांचाही आढावा घेतला. यावेळी त्यांनी पाटण शहरांतर्गत ‘एकेरी वाहतूक सुरू करता येईल का, याची पाहणी प्रांताधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी. शहरात एकेरी वाहतूक करणे शक्य असल्यास तसे कळवावे. त्याबाबत नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.




