ताज्या बातम्या

जावळीत पारदर्शक कामांसाठी लक्ष ठेवणार–अतिश कदम

मेढा(अजित जगताप) : जावली पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ता शक्ती व धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीने कुसुंबी व केळघर भागात साथ दिलेली आहे. ही साथ जावळी तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून पारदर्शक विकास कामे होण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून लक्ष ठेवणार आहे .असे प्रतिपादन जावळी तालुक्यातील शिवसेनेचे आक्रमक पंचायत समिती सदस्य अतिश संतोष कदम यांनी मेढा येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.
श्रीराम नवमी निमित्त नूतन सभापती व उपसभापती यांनी पदभार स्वीकारला. श्रीराम हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. अशा श्रीरामाचा आदर्श सर्वांनीच घ्यावा. परंतु, चुकीचे काय होत असेल तर त्याच श्रीरामाच्या हातातील धनुष्यबाणाने योग्य घड्याळाच्या वेळी वेध घेतला जाईल. हे सुद्धा संबंधितांनी लक्ष ठेवावे. असेही सूचित केले आहे.
प्रभू श्रीराम हे ‘मर्यादा पुरुषोत्तम आहेत.’ आदर्श चारित्र्यासाठी, धर्मपालनासाठी त्यांनी सत्तेचा त्याग केलेला आहे. आम्हीही सत्तेचा त्याग करूनच जनतेची सेवा करणार आहे. वाल्मिकी रामायणात नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्यात १६ मुख्य सद्गुण आहेत, ज्यात सत्यवचनी, दृढनिश्चयी, कृतज्ञ, आणि परोपकारी असणे यांचा समावेश आहे. ते एक आदर्श पुत्र, बंधू आणि राजा होते. त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येकांना न्याय देण्यासाठी वेळ पडल्यावर रस्त्यावर सुद्धा उतरणार असे त्यांनी सांगितले.जावळी तालुक्यातील जनतेने शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य निवडून दिलेले आहेत.
भाजपच्या कारभाराला कंटाळून जावळी तालुक्यात मतदारांनी मतदान दिलेले आहे. याची जाणीव ठेवूनच कोणतेही गद्दारी न करता आम्ही सक्षमरित्या विरोधी पक्ष काय आहे हे दाखवून देऊ? चांगल्या कामाला साथ आणि वाईट कामाला विरोध हा आमचा कायम राहील. असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे आदरणीय नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराजे देसाई, संपर्क नेते शरद कणसे, कामगार नेते ऋषिकांत शिंदे, संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, ज्येष्ठ मार्गदर्शक बापूराव पार्टे, जिल्हाप्रमुख रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणार आहे. जावळी तालुक्यातील महायुती सोबतच राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्ष कार्यकर्ते , शिवसैनिक यांनी मतदानासाठी प्रयत्न केले आहे . ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केले त्या मतदारांच्या विचारांचा अवमान कधीही होणार नाही. बोंडारवाडी धरण पूर्णत्वासाठी वेळ पडल्यावर रस्त्यावर आंदोलन सुद्धा करू असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांच्या सहकार्याने सक्षमरित्या विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडण्यात येईल. जावळी पंचायत समितीच्या माध्यमातून ज्यांना विकास कामासाठी सहकार्य हवे आहे. राजकीय पक्ष न पाहता एक समाजसेवक म्हणून सर्वांचे स्वागत केले जाईल. निवडणुका येतील व जातील. पण कायम ऋणानुबंध राहिले पाहिजे. या साठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. जावळी पंचायत समिती सदस्य जरी असलो तरी आदरणीय सहकारी प्रशांत जुनघरे, राजू धनावडे ,प्रशांत पाटील, सचिन पार्टे, राजाराम भिलारे, संकेत पाटील, जितेंद्र कासुर्डे, अमन चव्हाण, संजय जुनघरे, प्रीतम पार्टे यांचेही सहकार्य मोलाचे आहे. याचाही त्यांनी पुनरुचार केला. राजकारणातील पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले आहे. त्या यशाच्या कायमच्या ऋणात राहणार आहे . केळघर परिसरातील अनुभवी लोकांच्या अनुभवाच्या शिदोरीतून नक्कीच चांगले काम होईल. असाही त्यांनी आशावाद व्यक्त केला आहे.

_________________________________

फोटो –शिवसेनेचे जावळी पंचायत समिती सदस्य अतिश संतोष कदम

Scroll to Top