मुंबई(रमेश औताडे) : हवामान बदलाचा परिणाम आता अधिक गंभीर स्वरूपात समोर येत असून, तापमानातील असामान्य बदलामुळे दरवर्षी सुमारे ७ लाख लोकांचा अकाली मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय संशोधनांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.
तज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि थंडीतील तीव्र बदल यामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि गरिबी रेषेखालील नागरिक यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
जागतिक स्तरावर परिस्थिती आणखी चिंताजनक असून, २०५० पर्यंत हवामान बदलामुळे लाखो अतिरिक्त मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उष्णतेमुळे होणारे हृदयविकार, श्वसनाचे आजार, तसेच संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही केवळ भविष्यातील समस्या नसून सध्या सुरू असलेले संकट आहे. तापमानवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रभावी धोरणे राबविण्याची गरज आहे. हरित क्षेत्र वाढवणे, प्रदूषण नियंत्रण आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यावर भर देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांमुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येण्याची शक्यता असून, शासनाने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.




