मुंबई (शांताराम गुडेकर ) : नालासोपारा पूर्व येथील डिव्हाईन हायस्कूल येथे रविवारी रक्तदान शिबीर पार पडले. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून समर्थ अवनी फाउंडेशन आणि रेल्वे प्रवासी प्रगती मित्र मंडळ, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज तथा रायजीबाई धोंडू शिंदे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विविध जनसेवा सुरू असतात. त्यामध्ये प्रामुख्याने अनाथ-अंध-अपंग-कर्णबधीर मुलांना वैद्यकीय व आर्थिक मदत करण्यात येते. शिवाय बाराशे अंध परिवारांना अन्नधान्य किट वाटप करण्यात येते. अनाथाश्रम मध्ये अनाथ परिवाराच्या सानिध्यात दिवाळी फराळ वाटून दिवाळी साजरी करण्यात येते.फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात येते.
सध्या अखंड महाराष्ट्रात रुग्णाची संख्या वाढत असून त्यांना योग्य उपचारासाठी खूप त्रास सहन करावा लागत असून प्रामुख्याने रक्ताचा तुटवडा भासतो. रक्ताच्या अपुऱ्या सुविधे अभावी काही गरजू रुग्णांना जीव देखील गमवावा लागतो. या गंभीर समस्येचे निराकरण करताना खारीचा वाटा उचलावा या उदात्त हेतून समर्थ अवनी फाउंडेशन आणि रेल्व प्रवासी प्रगती मित्र मंडळ तसेच रायजीबाई धोंडू शिंदे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. समर्थ अवनी फाउंडेशनचे सदस्य, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे कार्यकारी संपादक श्री. प्रवीण पारावे, सेक्रेटरी श्री. उमेश कातकर, सदस्य श्री. सुनील निंगावले, श्री. काशिनाथ साळवी, पत्रकार श्री. तुषार मांडवकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तथा रेल्वे प्रवासी प्रगती मित्र मंडळाचे सचिव श्री. परशूराम वाघारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. तर अध्यक्ष श्री. मनोहर गोताड यांच्या हस्ते पूजेला सुरुवात झाली. महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे मुंबई कार्यकारी संपादक श्री.सागर शिगवण यांच्या हस्ते श्री गणरायाला पुष्पहार घालण्यात आला. तसेच सदस्य पत्रकार श्री. सचिन सापते यांच्या हस्ते छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात झाली.
पहिल्या दहा रक्तदात्यांची ओवाळणी करून रक्तदान करण्यासाठी बसवण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून, रक्तदानाची प्रक्रिया पार पडली. तरुणांनी प्रामुख्याने रक्तदानाला महत्त्व दिलं असल्याने या रक्तदान शिबिर कार्यक्रमाची शोभा वाढली. या रक्तदानासाठी १५६ रक्तदात्यांनी सहभाग दर्शविला. ब्लड बँक तर्फे प्रत्येकाला प्रमाणपत्र तसेच समर्थ अवनी फाउंडेशन आणि रेल्वे प्रवासी मित्र मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन प्रत्येक रक्तदात्याचा सत्कार करण्यात आला.
सदर शिबिरामध्ये मान्यवर म्हणून कुणबी समाज उन्नती संघ दापोलीचे पदाधिकारी श्री. विश्वनाथ रक्तेजी तर विभागातील नगरसेवक श्री निलेश चौधरी सर, समाजसेवक डॉक्टर श्री. संजयजी जाधव, समाजसेवक श्री. अमितजी वैद्य, समाजसेवक ब्रिजेशजी पेंडा, कुणबी युवा विरार पदाधिकारी श्री. किशोर भेरेजी, श्री. अविनाश पाचकळे, श्री. एकनाथ डिंगणकर, श्री. ठोंबरे सर, श्री. शैलेश दळवी सर, श्री. बामणे सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मोरेगाव तलाव रिक्षा चालक मालक संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी श्री. घटकर साहेब, भाजपा पदाधिकारी किरण परब मॅडम आणि त्यांचा सह १० सदस्य यांनी उपस्थित राहून स्वतः रक्तदान करून आदर्श निर्माण केला. तर नालासोपारा विरार पंचक्रोशी मंडळ दाभोळ चे पदाधिकारी श्री. संतोष अडखळे सर, व अन्य पदाधिकारी यांनी देखील स्वतः रक्तदान केले. अन्य मान्यवरांनी सहभाग दाखवला.
कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक सदस्यांनी स्वतः घेतली आणि कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या पार पाडला. या शिबिरामध्ये महिलांनी रक्तदानासाठी उत्सुकता दाखवली. काही सदस्यांनी पहिल्यांदा रक्तदान केल्याने आम्ही समाधानी असल्याचे आनंदाने बोलून दाखवले. तर “समर्थ अवनी फाउंडेशन कायम तुमच्या पाठीशी राहील” अशा शब्दात फाउंडेशनचे संस्थापक श्री जितेंद्र शिंदे सर यांनी आपला विश्वास सर्व रक्तदात्यांना व सभासदांना दिला. तर रेल्वे प्रवासी प्रगती मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री मनोहर गोताड सर यांनी आतापर्यंत केलेल्या जनसेवा बद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. दिपक मांडवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून प्रत्येक रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार मानले. या रक्तदान शिबिरासाठी पल्लवी ब्लड बँक चे श्री. भारत आरेकर सर आणि महात्मा गांधी ब्लड बँक चे श्री अजीम सर यांनी सर्वात मोठे सहकार्य केलं. त्यांच्या संपूर्ण डॉक्टर्स आणि टीमने अतिशय छान रित्या सर्व रक्तदात्यांना सहकार्य केलं आणि नालासोपारा मध्ये हा पहिलाच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाबद्दल विविध ठिकाणी समर्थ अवनी फाउंडेशन आणि रेल्वे मंडळाचे आणि रायजीबाई धोंडू शिंदे प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाची संपूर्ण यश हे सर्व सदस्यांचा असून अंततः संस्थापक श्री जितेंद्र शिंदे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला.




