मुंबई : धारावी येथील एका साध्या १० बाय १० च्या घरातून मानवतेची मोठी सेवा घडताना दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सौ.सविता अनिल होळमुखे गेल्या १३ वर्षांपासून टाटा मेमोरियल रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दररोज विनामूल्य अन्नदान करत आहेत.
दररोज सुमारे २५० जणांसाठी त्या डाळ, भात, भाजी आणि चपाती असे साधे पण पौष्टिक जेवण स्वतः बनवतात. कोणतेही मानधन न घेता पूर्णपणे सेवाभावाने सुरू केलेला हा उपक्रम आज अनेक गरजूंसाठी मोठा आधार ठरत आहे.
या कार्यासाठी ‘अन्नदाता सुखी भव’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली असून सविता होलमुखे या संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सुपुत्र जय अनिल होळमुखे अध्यक्ष म्हणून तर जोशना आनंद लोखंडे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त नेरुळ सेक्टर ४८ येथील गणेश मैदान येथे सविता होलमुखे यांना “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमास त्या उपस्थित राहू शकल्या नसल्याने हा सन्मान त्यांच्या मुलगा जय होलमुखे यांनी स्वीकारला. समाजासाठी निस्वार्थ भावनेने केलेले त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




