मुंबई(अजित जगताप) : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. अशा वंदनीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची ११६वी जयंती मंगळवार दि. १० मार्च, २०२६ रोजी सकाळी१० ते १०.३० वाजता शासकीय निवासस्थान “मेघदूत” बंगला, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे, मा.ना.श्रीमती सुनेत्राताई अजित पवार व मंत्रीमंडळातील अन्य मंत्रीगण यांचे सन्माननीय उपस्थितीत प्रतिमापूजन / अभिवादन करणेचे नियोजित केले आहे. राज्याचे पर्यटन खनिकर् माजी सैनिक कल्याण व सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयामार्फत कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
सातारा जिल्ह्याची पोलादी पुरुष असलेले दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांचा जन्म १० मार्च १९१० रोजी सातारा जिल्ह्यातील विहे (ता. पाटण) येथे झाला. त्यांनी दवाखान्यातील झाडलोट व इतर मिळेल ती कामे स्वीकारून आपले शिक्षण सुरू ठेवले. इंग्रजी चौथीच्या परीक्षेत १५० विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. एल. एल. बी. होईपर्यत शिक्षण घेतले.
सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य (१९३९) आणि अध्यक्ष झाले (१९४१-५२). बोर्डाची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना सरकारी मंजुरीच्या अपेक्षेवर काढलेल्या ५५ शाळा व ३८८ शिक्षकांचा प्रश्न त्यांनी कौशल्याने सोडविला. .
द्विभाषिक मुंबई राज्यात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री व बाळासाहेब बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले (१९५७-६०). त्यांनी या खात्याचा बारकाईने व तौलनिक अभ्यास केला. ज्यावेळेस अर्थसंकल्पात रस्ते खर्चासाठी सोळा कोटींमधील फक्त दोन कोटी महाराष्ट्रासाठी व चौदा कोटी गुजरातसाठी ठेवले गेले, तसेच गुजरातमधील पाटबंधारे कालव्यांची (कॅनॉल्स) कामे शोभीवंत फरशी (टाइल्स) बसवून करण्याचे ठरले, तेव्हा हा महाराष्ट्रावर होणारा अन्याय त्यांनी कणखरपणे पुराव्यांसह मांडला.
महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षणमंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले (१९६०-६२). ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १२०० च्या आत आहे, अशा आर्थिकदृष्ट्या मागास पालकांच्या मुलांना सर्व शिक्षण मोफत देण्याची योजना (ई. बी. सी.) त्यांनी १३ जून १९६० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली. शिक्षण घेताना गरिबी आड येऊ नये, हा या योजनेचा हेतू होता. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. कसेल त्याची जमीन हा दृष्टिकोणातून कृषी खात्याचे मंत्री असताना त्यांनी शेती सुधारणेच्या योजना कार्यान्वित केल्या कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना केली (जून १९६३).११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना परिसर भूकंपाने हादरून गेला. यावेळी भूकंपग्रस्तांना सर्व प्रकारचे साह्य करून शासकीय मदत मिळवून दिली.
पाटण परिसरात विविध संस्था, कार्यालये, रस्ते, सहकारी साखर कारखाना, कोयना एज्युकेशन सोसायटी, माध्यमिक शाळा व महाविद्यालय इत्यादींची उभारणी केली. तर कोल्हापूर येथील भुयारी गटार योजना, एस. टी. स्थानक, गुळ संशोधन केंद्र, जोतिबा डोंगरावर सुविधा, रस्ते, धरण इमारती, सरकारी कार्यालये इत्यादींची उभारणीत योगदान दिले.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया व शिवाजी पार्क या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे उभे पुण्यात बाळासाहेब देसाई यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने अतिदुर्ग व मागासलेल्या डोंगरकड्या कपारीतील लोकांना शासकीय सेवेत संधी मिळाली. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे नातू पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणच्या विकासामध्ये चार चांद लावलेले आहेत. आज पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्हा व मुंबई निवासी पाटण तालुक्यातील जनता उपस्थित राहणार आहे . हीच त्यांच्या कार्याची ओळख आहे.
______________________________
फोटो– लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासमवेत बाल शंभूराज देसाई (संग्रहित छायाचित्र) (सौजन्य- निनाद जगताप, मुंबई)




